शिवसेना ठाकरे गटात आता उभी फुट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाने व्हिप बजावूनही सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहीले. शिवाय त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र ही लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट भलताच आक्रमक झाला आहे. आता आम्ही रस्त्यावर उतरणार. ही लढाई रस्त्यावर होणार. या पुढे आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार अशा गंभीर इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पुढची रणनिती काय असेल हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सर्वांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
संजय राऊत या फुटीनंतर प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे असं स्पष्ट केलं. त्याचं ऑपरेशन काय होतं टायगर? लपणारे कधी टायगर नसतात. आम्ही खरे टायगर आहोत. त्यामुळे आम्ही म्हणतोय तुडवू म्हणून. आम्ही ऑपरेशन तुडवा सुरू करणार असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय राडेबाजीवर आम्हाला आव्हान देवू नका असं त्यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं. जर द्यायचचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवा. ईडी, सीबीआय आणि पोलीस फक्त अर्धातास माझ्या ताब्यात द्या. सर्वात पहिले गिरीश महाजनचं फुटीतील असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचं, बेईमानी पोसण्याचं काम गिरीश महाजन करत आहेत. गद्दारांना कोणती भाषा वापरायची असा प्रश्नही त्यांनी महाजन यांना केला. आम्ही राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहीलं आहे असं गिरीश महाजन म्हणत आहेत. मग तसं असेल तर पोलीसांचा ताफा बाजूला ठेवा. मग बघा असं आवाहन ही त्यांनी दिलं. आमच्याकडे काही नाही मग गद्दारांना सुरक्षा दिली. त्यांची सुरक्षा कशासाठी वाढवली? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना, मग त्यांना वाय प्लस सुरक्षा का? घरावर सुरक्षा का? त्यांच्या संपत्तीवर सुरक्षा का? असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे आता राडे करण्यासाठी कोणी शिल्लक राहीलं नाही अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
बंडखोर खासदारांना 40 पोलीसांची सुरक्षा कशाला दिली आहे. सुरक्षा कवचात राहून ते आम्हाला विचारणा करत आहेत. त्यांची सुरक्षा काढा मग अंगावर चिंधी राहते का ते बघा असं ही राऊत म्हणाले. त्यांना भीती नाही ना, खऱ्या शिवसेनेपासून मग हे बोलू नका. ईडी सीबीआयची मस्ती दाखवू नका असं प्रत्युत्तर त्यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे. शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या वर्षातच यांनी बेईमानी केली आहे. त्यामुळे ही चिड आहे. त्यामुळे हा संताप आहे. पैशे घेता आणि बेईमानी करता त्यांना तुडवलचं पाहीजे. तसे आदेश या आधी ही बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत असं ही राऊत यावेळी म्हणाले. ही लढाई आता संसदेत, कोर्टात आणि रस्त्यावर ही चालेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world