IPL New Rule: आयपीएलच्या चालू हंगामात खेळाडूंच्या शिस्तीबाबत आणि सामन्याच्या वेळेचे नियोजन करण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) एक कडक नियमावली जाहीर केली आहे. सामन्याच्या मूळ 16 खेळाडूंच्या यादीत नाव नसलेल्या कोणत्याही खेळाडूला आता सीमारेषेच्या आत प्रवेश करता येणार नाही. यामुळे राखीव खेळाडूंच्या मैदानावरील वावरावर आता पूर्णपणे निर्बंध आले आहेत.
नेमका काय आहे नवीन नियम?
'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व फ्रँचायझींना खालील सूचना दिल्या आहेत. जे खेळाडू 16 जणांच्या अधिकृत संघात नाहीत, ते आता खेळाडूंसाठी पाणी, बॅट किंवा ड्रेसिंग रूममधील निरोप घेऊन मैदानात जाऊ शकणार नाहीत. केवळ 16 जणांच्या यादीत नाव असलेले खेळाडूच मैदानावर आवश्यक कारणांसाठी जाऊ शकतील.
मैदानाच्या प्लेइंग इलेव्हनबाहेरील केवळ 5 खेळाडूंनाच सीमारेषेच्या आसपास वावरण्याची परवानगी असेल. इतर खेळाडूंना डगआउटमध्ये बसावे लागेल, परंतु त्यांना सीमारेषा आणि एलईडी जाहिरात बोर्ड यांच्या दरम्यान फिरता येणार नाही.
नियमावलीतील तांत्रिक बदल
बीसीसीआयने 'मॅच प्लेइंग कंडिशन्स' (MPC) मधील जुन्या कलमांमध्ये सुधारणा केली आहे.
कलम 11.5.2: केवळ पंचांच्या परवानगीने आणि खेळाचा वेळ वाया न घालवता योग्य गणवेशात ड्रिंक्स मैदानात नेता येतील.
कलम 24.1.4: सामन्यात सहभागी नसलेल्या आणि राखीव क्षेत्ररक्षक म्हणून काम न करणाऱ्या संघ सदस्यांनी प्लेइंग एरियामध्ये असताना 'ट्रेनिंग बिब्स' घालणे अनिवार्य आहे.
नव्या निर्णयामागील कारण काय?
बीसीसीआयने या निर्णयाचे अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही, तरीही तज्ज्ञांच्या मते राखीव खेळाडू वारंवार मैदानात गेल्यामुळे सामन्याचा वेळ वाया जातो, हे टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असावे. मैदानात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी केवळ मर्यादित खेळाडूंनाच हालचालींची मुभा देण्यात आली आहे.