Kalyan News : कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वाहतूक पोलिसाला 3 व्यक्तींनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कर्तव्य बजावताना पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
वाहन कडेला घेण्यास सांगितल्याचा राग...
नांदिवली येथील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस देविदास वाघेरे हे कार्यरत होते. यावेळी त्यांनी एका कारमधील व्यक्तींना वाहन रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितलं. मात्र, पोलिसांच्या सूचनेचा राग आल्याने संबंधित कारचालक आणि त्याच्या साथीदारांनी वाघेरे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. वाद वाढत जाऊन दोघांनीही वाघेरे यांना ठोसे आणि बुक्क्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या मारहाणीमध्ये वाघेरे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी जखमी पोलीस देविदास वाघेरे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सागर साळुंखे आणि आतिष दहातोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. या पूर्वीही कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या तीन घटना घडल्या आहेत. ही घटना चौथी आहे आहे. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world