
विशाल पाटील, मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) सुरू केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाचे पहिले टप्पे पूर्ण झाले असून, त्याचे निष्कर्ष काहीसे निराशाजनक आहेत. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील ५६८ बस स्थानकांपैकी तब्बल १४९ बस स्थानके स्वच्छतेच्या निकषांवर 'नापास' झाली आहेत, तर केवळ २०१ स्थानकांना ७० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
राज्यातील बस स्थानकांवरील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने २३ जानेवारीपासून हे विशेष स्वच्छता सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत स्वच्छतेच्या विविध आधारांवर बस स्थानकांना गुण देण्यात आले.
एसटी महामंडळाच्या बसेसमधून राज्यात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची ही प्रचंड संख्या पाहता, बस स्थानकांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, पहिल्या सर्वेक्षणाचे आकडेवारीनुसार, सुमारे २६% बस स्थानके स्वच्छतेच्या किमान अपेक्षाही पूर्ण करू शकलेली नाहीत. दुसरीकडे, ७० पेक्षा जास्त गुण मिळवणारी स्थानके एकूण स्थानकांच्या ३५% पेक्षाही कमी आहेत, जे दर्शवते की बहुतांश बस स्थानकांना अजूनही स्वच्छतेच्या बाबतीत खूप सुधारणा करण्याची गरज आहे.
हे स्वच्छता अभियान चार टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे आणि हे या अभियानाचे पहिले सर्वेक्षण होते. याचा अर्थ, अजून तीन सर्वेक्षणे बाकी आहेत, ज्यातून बस स्थानकांच्या स्वच्छतेच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल. एसटी महामंडळाने या अभियानासाठी मोठी बक्षीस रक्कमही जाहीर केली आहे. संबंधित विजेत्या बस स्थानकांना महामंडळातर्फे एकूण ३ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या बक्षीस रकमेमुळे बस स्थानकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world