नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक 12 मध्ये अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुरस्कृत उमेदवार वैशाली वाळुंजकर यांच्या 'ईव्हीएम' (EVM) मधील बटनावरून मोठा गोंधळ उडाला आहे. मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे उमेदवार आणि मतदार दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे यशवंतराव चव्हाण चौक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नेमके काय घडले?
अनेक मतदार मतदानासाठी केंद्रात गेले असता, त्यांना वैशाली वाळुंजकर यांच्या चिन्हासमोरील बटण दाबताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे लक्षात आले. उमेदवार वैशाली वाळुंजकर यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. आपल्या हक्काचे मतदान तांत्रिक बिघाडामुळे वाया जात असल्याचा आरोप करत उमेदवार आणि त्यांचे समर्थक वैतागल्याचे पाहायला मिळाले. "इतर उमेदवारांची बटणे चालतात, मग केवळ राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेच बटण का बंद पडले? असा सवाल करत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(नक्की वाचा- Kalyan News: उत्साहात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्का; नेमकं काय झालं?)
निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
काही उमेदवारांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाड नसून निवडणूक नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे वाळुंजकर यांच्या मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संतापलेल्या मतदारांनी काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती.
(नक्की वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)
प्रशासकीय हस्तक्षेप
गोंधळाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सेक्टर ऑफिसर यांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील केंद्रावर धाव घेतली. तांत्रिक पथकाने मशीनची तपासणी केली असून, बिघाड दुरुस्त करण्याचा किंवा मशीन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world