
गणेशोत्सव नुकताच पार पडला. या गणेशोत्सवात डीजेची धुम पाहायला मिळाली. त्याचे दुष्परिणाम ही समोर आले. काहींना बहीरेपणा आला तर काहींना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे ही समोर आले. त्यामुळे उत्सवात डीजेचा वापर असावा की नसावा याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात पुण्याचे कलावंत ट्रस्ट आता पुढे सरसावले आहे. डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, त्याचे आरोग्यावर व समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत कलावंतांनी आवाज उठवला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन ही दिले आहे.
नक्की वाचा - Pune News: पुण्यात भुंग्याची नवी प्रजाती सापडली, नाव ही ठरलं, वाचा सविस्तर
पुणे हे कला आणि संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकांना डीजेच्या अतोनात आवाजामुळे एक विकृत स्वरूप प्राप्त होत असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे. तशी त्यांची तक्रार ही आहे. धार्मिक-सांस्कृतिक उत्सव साजरे करण्याऐवजी त्यातून ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून अस्वस्थता आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने यावर नियंत्रण आवश्यक असल्याचा सूर कलावंतांनी व्यक्त केला. असे त्यांनी मुख्यंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यासाठी कलावंत ट्रस्टने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. दर शनिवार-रविवारी ही मोहीम बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून मिळालेल्या जनसमर्थनाच्या आधारे शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. कलाकार सौरभ गोखले यांनी या उपक्रमाविषयी एनडीटीव्ही मराठीला आपली प्रतिक्रीया दिली आहे. “धार्मिक मिरवणुकींना डीजेमुळे विकृत वळण लागले आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.” असं त्यांनी सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world