
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेच्या समस्या थेट सोडवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 'जनसंवाद' नावाच्या या विशेष अभियानाची सुरुवात येत्या 13 सप्टेंबरपासून हडपसर येथून होणार आहे. या उपक्रमाद्वारे, सामान्य नागरिक आता व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या मदतीने आपल्या समस्या थेट अजित पवारांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत. या अभिनव पुढाकारामुळे जनतेला त्यांच्या समस्यांवर जलद आणि प्रभावी तोडगा मिळेल असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
समस्या व्हॉटसअपवर कशी मांडायची ?
अजित पवार यांनी जारी केलेल्या एका पोस्टनुसार, नागरिक 7888566904 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे आपली समस्या नोंदवू शकतील. या समस्या थेट अजित पवारांपर्यंत पोहोचतील आणि त्यावर तातडीने पाठपुरावा करून समाधान मिळवून दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. 'जनसंवाद' हे अभियान हडपसरसह संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती वेळोवेळी माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली जाईल असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट)
लगेच ७८८८५६६९०४ या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करून तुमची समस्या नोंदवा. तुमच्या समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर पाठपुरावा करून त्यावर समाधान मिळवून देऊ.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 11, 2025
येत्या १३ सप्टेंबरपासून हडपसरपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणाऱ्या ‘जनसंवाद' या विशेष… pic.twitter.com/RLzCdhpBaX
ऑन द स्पॉट समस्या सोडवणार
ज्या नागरिकांना त्यांच्या समस्या नोंदवायच्या आहेत, त्यांना 7888566904 या व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर आपली माहिती आणि समस्या नोंदवावी लागेल. त्यानंतर, जेव्हा त्यांच्या भागात 'जनसंवाद' कार्यक्रम आयोजित केला जाईल, तेव्हा त्यांना आमंत्रित केले जाईल आणि निश्चित वेळ दिला जाईल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांना संबंधित अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले जाईल, जेणेकरून नागरिक थेट संवाद साधून आपल्या समस्या समजावून सांगू शकतील आणि त्यावर त्वरित तोडगा काढू शकतील. अजित पवार यांनी स्वतः या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ते प्रत्येक नागरिकाच्या समस्यांवर लक्ष ठेवतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. "जनसंवादातून जनविकास हा आमचा ध्यास आहे," असे त्यांनी म्हटले आहे. जनतेच्या न्याय-हक्कांसाठी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- Pune News: वाढदिवसाची शोभायात्रा ठरली जीवघेणी! डीजे वाहनाने सहा जणांना चिरडलं; एकाचा मृत्यू)
राज्यभर 'जनसंवाद' कार्यक्रम राबविणार
हा 'जनसंवाद' कार्यक्रम केवळ समस्या ऐकून घेण्यापुरता मर्यादित न राहता, त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे. 'चांद्यापासून बांद्यापर्यंत' सर्वांगीण विकास साधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस आहे. हडपसरमध्ये होणाऱ्या पहिल्या 'जनसंवाद' कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. या उपक्रमामुळे सामान्य नागरिक आणि शासन यांच्यातील दरी कमी होईल आणि प्रशासकीय कामात अधिक पारदर्शकता येईल, असा दावा केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world