Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवून घेणारा 67 वर्षांचा अशोक खरात हा केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने 5 जणांचा नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 30 वर्षांच्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला हा तपास आता थेट मानवी बळी आणि वन्यजीव शिकारीपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे.
सिद्ध पुरुषाच्या नावाखाली शोषणाचा काळा खेळ
अशोक खरात याने नाशिकमध्ये आपले एक जाळे विणले होते. तो महिलांना अंगावर टाकण्यासाठी खडे आणि खाण्यासाठी पेढे देत असे. तसेच पिण्याच्या पाण्यात गुंगीचे अमली पदार्थ मिसळून महिलांना अस्वस्थ केले जायचे. जेव्हा महिलांची शुद्ध हरपायची किंवा त्यांना मळमळ व्हायची, तेव्हा त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खरात त्यांचे लैंगिक शोषण करत असे.
धक्कादायक बाब म्हणजे 67 वर्षांचा हा आरोपी 30 वर्षांच्या तरुण महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करत होता. त्याच्या फार्म हाऊसवरून पोलिसांना 6 लाख 53 हजार रुपयांची रोकड, लॅपटॉप आणि एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. या रिव्हॉल्व्हरवर चक्क राजमुद्रा कोरलेली असून त्यासोबत 31 जिवंत काडतुसेही सापडली आहेत.
( नक्की वाचा : Ashok Kharat : एपस्टीनचा बाप' निघाला अशोक खरात; 56 आक्षेपार्ह क्लिप्स? 7 बड्या नेत्यांचे फोटो, अजून किती बाकी? )
पाच नरबळींचा संशय आणि गोळीबाराचे गूढ
न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांनी मांडलेला मुद्दा सर्वात जास्त भीतीदायक होता. खरातच्या ताब्यातून मिळालेल्या काडतुसांपैकी 5 काडतुसे फायर झालेली म्हणजेच वापरलेली आढळली आहेत. या 5 गोळ्या नेमक्या कुठे झाडण्यात आल्या, याचा तपास करताना पोलिसांनी खरातने 5 जणांचा नरबळी दिला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच त्याच्याकडे सापडलेल्या डायऱ्या आणि कागदपत्रांमधून या प्रकरणाचे धागेदोरे सेक्स, फ्रॉड आणि प्रॉपर्टी अशा तीन मोठ्या गुन्ह्यांशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीतील भयंकर भांडण, शेजारच्या अंगावर सोडला कुत्रा, 3 दिवस... )
वन्यजीवांचा वापर आणि शिकारीचा संशय
अशोक खरात हा केवळ माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही आपल्या भोंदूगिरीसाठी वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तो लोकांना भीती दाखवण्यासाठी जिवंत साप आणि वाघाचा वापर करत असे. हे प्राणी त्याने कुठून आणले आणि ते खरे होते की बनावट, याचा तपास आता वन विभाग आणि पोलीस मिळून करत आहेत.
त्याच्याकडे हरणाची दुर्मिळ मानली जाणारी काळी आणि पांढरी कस्तुरी देखील सापडली आहे. यामुळे त्याने हरणाची शिकार केली आहे का, या अँगनलने वन्यजीव कायद्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे.
खरातच्या वकिलांनी काय सांगितले?
न्यायालयात हजर केले असता अशोक खरातने आपल्याला साप किंवा वाघाबद्दल काहीही माहिती नसल्याचा दावा केला. मी फक्त सणासुदीला मंदिरात जात होतो, असे सांगून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि 30 वर्षांच्या महिलेने दिलेली फिर्याद खरातच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे.
एसआयटी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, ईशान्येश्वर मंदिरातील विधी आणि खरातचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. या गुन्ह्यातून समाजाला मोठा संदेश देण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world