
मध्य रेल्वेवरील अपुरी लोकल संख्या, प्रवाशांची वाढणारी गर्दी, एक्स्प्रेसमुळे लोकलला होणारा उशीर हे मुंबईकरांसाठी नेहमीचं झालं आहे. कामावर पोहोचण्यासाठी कधी दारावर लटकून तर कधी चेंगराचेंगरीत जीव मुठीत धरून करावा लागणारा प्रवास याचा मुंबईकरांना दररोज सामना करावा लागतो. दररोज यातून कित्येक प्रवाशांचा हकनाक बळी जातो. आज सकाळी 9 वाजेदरम्यान कसारा लोकलमधून पडल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका बॅगमुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे. यामध्ये 5 ते 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत नोकरदार वर्गाची मोठी गर्दी असते. अपुरी लोकल संख्या आणि कामावर वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी लटकून आणि गर्दीतून प्रवास करतात.
नक्की वाचा - Belapur Crime: भरचौकात हत्येचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाला संपवलं
बॅगेने घात केला?
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान कसारा ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी फूटबोर्डवरुन प्रवास करीत होते. या लोकलमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना फूटबोर्डावरून लटकून प्रवास करावा लागतो. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवाशाची बॅग खेचली गेली. तो प्रवासी खाली कोसळला, यामुळे आजूबाजूला लटकलेले प्रवासाही खेचले गेले. त्यातून आठ प्रवासी ट्रॅक पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील एका प्रत्यक्षदर्शीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world