जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये नराधमाचा भररस्त्यात हैदोस! 22 वर्षीय तरुणीला गाठून केलं असं की... लोकांचा सुटला संयम

Kalyan News:  मिळालेल्या माहितीनुसार, एक 22 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती जोशीबाग परिसरातून जात असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला.

Kalyan News: कल्याणमध्ये नराधमाचा भररस्त्यात हैदोस! 22 वर्षीय तरुणीला गाठून केलं असं की... लोकांचा सुटला संयम
Kalyan News: :  कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई:

Kalyan News:  कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील जोशीबाग परिसरात एका तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, एक 22 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती जोशीबाग परिसरातून जात असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. याच दरम्यान त्या तरुणाने तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन केले. हा प्रकार घडताच आरोपीने तिथून पळ काढला.

नागरिकांनी आरोपीला पकडले

हा धक्कादायक प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या नजरेस पडला. भररस्त्यात तरुणीसोबत असे कृत्य होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी तातडीने आरोपीच्या दिशेने धाव घेत त्याचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला तो गर्दीचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, नागरिकांनी हार न मानता स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू ठेवला. अखेर नागरिकांनी त्याला शोधून काढले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले. प्रथमेश जाधव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: बैठक सुरू झाली अन् अचानक 60 - 70 जण घुसले; कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत जोरदार राडा )

या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिसांनी आरोपी प्रथमेश जाधव याच्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भररस्त्यात एका मुलीसोबत असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांतील घटनांचा आढावा घेतला तर कल्याण आणि डोंबिवली परिसरात महिला तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याशिवाय डोंबिवलीतही दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमधील चिंता अधिक वाढली आहे.

पोलिस गस्त वाढवण्याची मागणी

जोशीबाग येथील या ताज्या घटनेनंतर कल्याणमधील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः महिलांची ये-जा असणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, जेणेकरून महिलांना निर्भयपणे वावरता येईल, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com