जाहिरात

Mumbai News : मुंबईच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलला? वादाचं कारण ठरलेलं 'बदली' प्रकरण काय आहे?

Mumbai News : सध्या या बदली प्रकरणावरुन प्रशासनात आणि राजकीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai News : मुंबईच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलला? वादाचं कारण ठरलेलं 'बदली' प्रकरण काय आहे?

देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी

Mumbai Municipal Corporation News : मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बदल्यांवरून प्रशासनात आणि राजकीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या बदल्यांबाबत विविध तक्रारी आणि आक्षेप समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत बदल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदली प्रकरणावरून महापौराच्या पत्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

बदल्यांच्या आदेशांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश...

या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील काही अभियंत्यांच्या बदल्या नियमबाह्य पद्धतीने केल्या गेल्याच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या तक्रारीवरून या विषयात हस्तक्षेप करत बदल्यांच्या आदेशांची अंमलबजावणी थांबविण्याचे निर्देश दिले. याच पार्श्वभूमीवर सनदी अधिकारी अमित सैनी यांची देखील बदली करण्यात आली होती.

नक्की वाचा - लाडक्या बहि‍णींनी झटका; तब्बल 90 लाख महिलांची नावं हटवली, तुमचं नाव अजूनही आहे का? या लिंकवर लगेच तपासा

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितु राजेश तावडे यांनी महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देत सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत देण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा या बदली प्रकरणाला वेग आला असून प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणी...

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशानंतरही त्या स्थगितीला उठविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या निर्णयामागील नेमके कारण काय, तसेच शासनाच्या आदेशांनंतरही बदल्यांची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न का केला जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमुळे अनेक विभागांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शासनाने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. दरम्यान, प्रशासकीय पारदर्शकता आणि नियमांचे पालन याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com