Navi Mumbai Missing Girl Report: उपनगरांमधील शांततेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गेल्या 11 महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी विक्रमी वाढ दाखवली आहे. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 या काळात तब्बल 499 मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी 458 मुली परत मिळाल्या असून 41 मुली अद्याप शोधात आहेत. ही संख्या पालक, समाज आणि पोलिस यांच्यासाठी गंभीर इशारा देणारी आहे.
पोलिस ठाणानिहाय बेपत्ता मुलींची आकडेवारी
नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता मुलींची नोंद लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यात कोपरखैराणे, रबाळे MIDC, खारघर, तळोजा, वाशी, एपीएमसी या विभागांची स्थिती विशेषत: चिंताजनक आहे.
सर्वाधिक नोंदी असलेली पोलीस ठाणे:
कोपरखैराणे : 49 मुली (46 शोधल्या, 3 अद्याप बेपत्ता)
रबाळे MIDC : 41 मुली (38 शोधल्या, 3 अद्याप बेपत्ता)
खारघर : 33 मुली (31 शोधल्या, 2 अद्याप बेपत्ता)
तळोजा : 31 मुली (27 शोधल्या, 4 अद्याप बेपत्ता)
एनआरआय : 30 मुली (27 शोधल्या, 3 अद्याप बेपत्ता)
पनवेल शहर : 39 मुली (34 शोधल्या, 5 अद्याप बेपत्ता)
Navi Mumbai: नवी मुंबईतील 'या' भागात सुरु होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली अन् घडलं..
मुली बेपत्ता होण्यामागची धक्कादायक कारणे:
काही भागांमध्ये संख्या कमी असली तरी घटनांचे गांभीर्य कमी होत नाही. या 499 प्रकरणांपैकी पोलिसांनी बेपत्ता होण्याची प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत. यात कौटुंबिक तणाव आणि नातेसंबंधातील गैरसमज हा सर्वाधिक आढळलेला घटक आहे. ज्यामध्ये पालक रागावल्याने घर सोडणे 114,
प्रेमसंबंध प्रकरणे 128, नातेवाईकांकडे गेल्या पण कळवले नाही 103, फिरायला गेले व परत न आल्याने नोंद 63, मैत्रिणीकडे गेल्याने घरातून बाहेर पडणे 48, मतिमंद / मानसिक स्थितीमुळे भटकंती 1, अशी धक्कादायक कारणे समोर आली आहेत. यापैकी 458 मुलींना शोधण्यात आले आहे.
तुलनेत ४१ मुलींचा शोध अद्याप गूढच असून त्यासाठी सतत शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांच्या मते, बेपत्ता मुलींच्या बहुसंख्य घटना १५ ते १८ वर्षे या वयोगटात आढळतात. या वयात कौटुंबिक तणाव, मोबाईल वापर, सोशल मीडिया, नातेसंबंधातील आकर्षण, मानसिक दबाव आणि तात्कालिक रागामुळे अनेक मुली घर सोडतात.
बेपत्ता मुलींच्या काही प्रकरणांत POCSO कायद्यांतर्गतही गुन्हे नोंदवले गेले आहेत. काही मुली पोलीस ठाण्यात सापडल्या असल्या तरी त्यांना मानसिक आधार, समुपदेशन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची गरज भासते. पोलिस मान्य करतात की, नवी मुंबईत लोकसंख्या वाढ, शैक्षणिक वसतिगृहांची संख्या, नोकरी–शिक्षणासाठी आलेले तरुण, सोशल मीडिया यामुळे ही आव्हाने अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
Shocking News : पतीची विकृती! बायकोला संपवलं, मग WhatsApp वर ठेवला मृतदेहासह फोटो; नेमकं काय घडलं?
पोलिसांची कार्यवाही व आव्हाने:
- तात्काळ शोधमोहीम
- सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग
- मित्रपरिवार, सोशल मीडिया तपास
- बालकल्याण समितीशी समन्वय
- तक्रार मिळताच “झिरो डिले” नोंदणी
पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- 1. मुलांचा मोबाईल वापर नियंत्रित ठेवा
- 2. तक्रार करण्यास विलंब करू नका – प्रत्येक तास महत्त्वाचा
- 3. मुलांचे मानसिक आरोग्य, तणाव, मित्रपरिवार जाणून घ्या
- 4. गैरसमज वाढू देऊ नका, संवाद ठेवा
- 5. शाळा/कॉलेजकडून उपस्थिती व हालचालीची नियमित माहिती घ्या
- 6. सायबर जागरूकता वाढवा – अनोळखी व्यक्ती, ग्रुप, चॅटपासून सावधान
नवी मुंबईसाठी धोक्याची घंटा
नवी मुंबईसारख्या शहरात दरवर्षी शेकडो मुली बेपत्ता होणे ही फक्त आकडेवारी नाही—तर समाजातील बदलत्या परिस्थितीचे गंभीर प्रतिबिंब आहे. पोलिसांनी ९०% पेक्षा जास्त मुली शोधून काढल्या असल्या तरी ४१ मुलींचा शोध अद्यापही रहस्यमय आहे. शहरातील पालक, शाळा, समाजसंस्था आणि पोलिस यांनी एकत्रित प्रयत्न न केल्यास ही आकडेवारी भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world