
राहुल कांबळे
परदेशात आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवून वाशी इन्फोटेक पार्कमध्ये सुरू असलेल्या एका बनावट प्लेसमेंट एजन्सीचा पर्दाफाश झाला आहे. या एजन्सीने तब्बल 40 ते 50 जणांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये उकळण्यात आले आहेत. ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याचा संशय वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व मुलं सर्व सामान्य गरीब कुटुंबातील आहेत.
या बनावट कंपनीने सोशल मीडियावर विविध जाहिराती देऊन परदेशातील आकर्षक पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले. ‘क्रू मेंबर', ‘डेक कॅडेट', ‘इंजिन कॅडेट', ‘वर्क परमिट' व इतर अनेक हाय-प्रोफाईल जॉब्सची ऑफर देण्यात आली. अनेक तरुणांनी या जाहिरातींवर विश्वास ठेवून कंपनीच्या संपर्कात येत ऑनलाइन रजिस्ट्रेशन, व्हिडिओ कॉलवर इंटरव्ह्यू, आणि नंतर विमान तिकीट, वीजा प्रोसेस, डॉक्युमेंटेशन अशा नावांवर पैसे भरले.
नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात
या संपूर्ण प्रकारासाठी वाशी इन्फोटेक पार्कमध्ये एक भाड्याचे ऑफिस सुरू करून फसवणूक केली जात होती. ऑफिसमध्ये फसवणूक करणारे एजंट हे अत्यंत व्यावसायिक भाषेत बोलत होते. त्यांनी एक बनावट वेबसाइट, लोगो आणि ईमेल आयडी वापरून उमेदवारांना विश्वासात घेतले. काही कॅडेट्सनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसमध्ये भेट घेतल्यावर खऱ्या कंपनीसारखे वातावरण तयार करण्यात आले होते.
ही एजन्सी दिल्लीमध्ये हेड ऑफिस असल्याचा दावा करत असे. परंतु प्रत्यक्षात दिल्लीत अशा कोणत्याही कंपनीचे अस्तित्व नाही, हे पोलिस तपासातून उघड झाले आहे. पैसे भरल्यानंतर कंपनीचे संपर्क क्रमांक बंद येऊ लागले. ईमेलला उत्तर मिळेनासे झाले. ऑफिसमध्ये कोणीही उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच फसवणूक झाल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक पीडितांनी वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, एजन्सी चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
नक्की वाचा - MNS News: मनसेचा दणका! मुंबई अहमदाबाद मार्गावरील हॉटेलवरच्या गुजराती पाट्या तोडल्या
ही संपूर्ण फसवणूक सायबर गुन्हा, विश्वासघात,आणि आर्थिक फसवणूक या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत मोडते.फसवणूक झालेल्या तरुणांनी व त्यांच्या पालकांनी नवी मुंबई पोलिसांकडून जलद आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. “मुलांचे भविष्य हातचे गेले आहे, आमचे लाखो रुपये बुडाले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world