जाहिरात
Story ProgressBack

भाजपा 'या' राज्यात मुस्लीम राजाच्या नावावर मतं का मागत आहे?

भाजपावर अल्पसंख्याक विरोधी राजकारणाचा आरोप नेहमी केला जातो. उत्तर भारतामधील या राज्यात भाजपा चक्क मुस्लीम राजाच्या नावावर मत मागत आहे.

भाजपा 'या' राज्यात मुस्लीम राजाच्या नावावर मतं का मागत आहे?
हसन खान मेवाती
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आत पूर्ण झाले आहेत. आणखी तीन टप्पे बाकी असून त्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सत्तारुढ भारतीय जनता पक्षावर नेहमीच अल्पसंख्याक समाजावर भेदभाव केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो.  पण, उत्तर भारतामधील हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून चक्क मुस्लीम राजाच्या नावावर मत मागितली जात आहेत. 

हरयाणामधील नूंहमध्ये गेल्या वर्षी 31 जूलै रोजी दंगल झाली होती. या दंगलीमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. एका धार्मिक यात्रेच्या दरम्यान या दंगलीला सुरुवात झाली होती. त्यानंतर अनेक दिवस या भागात संचारबंदी लागू होती. या दंगलीनंतर मेवातमधील हिंदू-मुस्लीमांमध्ये दरी निर्माण झाली होती. हरयणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) या परिसरातील पुन्हानामध्ये निवडणूक प्रचार करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी 'मी भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्या हसन खान मेवाती (Hasan Khan Mewati)  यांना प्रणाम करतो.' असं वक्तव्य केलं होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सैनी यांनी 16 व्या शतकातील मेवातीचे राजा हसन खान मेवाती यांची प्रशंसा केली. पानिपतमध्ये 1526 साली झालेल्या लढाईत मेवाती हे मुघल राजा बाबरच्या विरुद्ध लढले होते. बाबर विरुद्ध झालेल्या या लढाईत त्यांना हौताम्य प्राप्त झाले.

मेवातचं राजकारण

हरयाणामधले भाजपा नेता सध्या हसन खान मेवाती यांची जोरदार प्रशंसा करत आहेत. मेवातचा परिसर हरयणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पसरलेला आहे. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तीन दिवस आधी नूंहमधील बडकली चौकात हसन खान मेवाती यांच्या प्रतिमेचं अनावरण केलं होतं.  त्यांनी यावेळी 15 मार्च रोजी शहीद दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर नलहरमधल्या शहीद हसन खान मेवाती मेडिकल कॉलेजमध्ये हसन खान मेवाती यांच्या नावावर शोधपीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला.  काँग्रेस सरकारच्या राजवटीमध्ये या मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती.   

मनोहरलाल खट्टर यांनी त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये नूंहमधील दंगलीचाही उल्लेख केला होता. 'बाहेरच्या शक्ती मेवातमधील नागरिकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. हसन खान मेवाती यांच्या देशभक्तीपासून प्रेरणा घेत लोकांनी बंधुत्वाची भावना कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं.  नूंहमधील दंमलीनंतर मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त करणारा हरयाणा सरकारचा हा पहिलाच प्रयत्न झाला होता.

( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
 

भाजपा नेत्यांना आठवण

प्रतिमा अनावरण कार्यक्रमानंतर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पुन्हानामधील सभेत नूंहचा पवित्र भूमी असा उल्लेख केला. ' राजा मेवाती बाबरसमोर झुकले नाहीत. त्यांनी 12 हजार सैनिकांसह बाबरविरुद्ध लढा दिला. बाबरशी लढता-लढता बलिदान दिलं, असं सैनी यांनी सांगितलं. कोणत्याही सरकारनं राजा मेवाती यांच्या हौताम्याकडं लक्ष दिलं नाही. मनोहरलाल खट्टर सरकारनं हे काम पहिल्यांदा केलं, याचा मला अभिमान आहे असं सैनी यांनी सांगितलं. 

हिंदुत्ववादी नेत्यांनी हसन खान मेवाती यांची प्रशंसा करण्याची ही पहिलीच घटना नाही. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 2015 साली मेवातमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हसना खान मेवाती यांचं भारतमातेचा पूत्रं असं वर्णन केलं होतं.

'माझी भाषा, धर्म आणि जात ही बाबरसारखी असेल, पण मी पहिल्यांदा भारतीय असून भारतमातेचा पूत्र आहे.' असं हसन खान मेवाती म्हणाले होते, असा उल्लेख भागवत यांनी केला होता. त्यानंतर 2021 मध्ये देखील भागवत यांनी मुस्लिमांनी मेवातींसारखा देशभक्तीचा मार्ग निवडवा असं आवाहन केलं होतं. 

किती मागास आहे नूंह ?

नूंहमधील जवळपास 80 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. नूंह जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीन्ही मतदारसंघात काँग्रेसलचे आमदार आहेत. फिरोजपूर झिरकामधील आमदार मामन खान यांना दंगलीच्या काळात अटक करण्यात आली होती. हे तीन्ही विधानसभा मतदारसंघ गुरुग्राम लोकसभा मतदारसंघात येतात. भाजपाचे इंद्रजीत सिंह 2009 पासून येथील खासदार आहेत. राजधानी दिल्लीच्या जवळ असूनही हा देशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये नूंहचा समावेश होतो.  

नरेंद्र मोदी सरकारनं जानेवारी 2018 मध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम (एडीपी) सुरु केला. त्यामध्ये देशातील सर्वात मागास 112 जिल्ह्यांचा समावेश होता. या यादीमध्ये  नूंह हा NCR भागातील एकमेव जिल्हा होता. या भागात केंद्र सरकारनं अनेक विकासकामं सुरु केली आहेत. त्याचा परिणाम नूंह जिल्ह्यात दिसतो. भाजपा नेत्यांकडून भाषणात त्याचा उल्लेख केला जातो.  

( नक्की वाचा : फक्त 15 सेकंद पोलीस बाजूला केले तर...अकबरुउद्दीन ओवैसींना नवनीत राणांचं चॅलेंज )
 

कोण होते हसन खान मेवाती?

हसन खान मेवाती यांचा जन्म राजस्थानमधील अलवरच्या खानजादा राजघराण्यात झाला. ते मुस्लीम राजपूत होते. हसन खान मेवाती यांना 'शाह-ए-मेवात' आणि 'दिल्लीचे कोतवाल' असंही म्हंटलं जातं. ते दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचे मामेभाऊ होते. बाबरनं पानीपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव केला होता. या पराभवानंतर दिल्लीवरील मुघल राजवटीला सुरुवात झाली. या लढाईत इब्राहिम लोदी आणि हसन खान मेवाती यांचे वडील अलावल खान मारले गेले.

बाबरच्या सैन्यानं मेवाती यांचा मुलगा ताहीरला कैद केलं होतं. ताहिरच्या सुटकेच्या बदल्यात मुघल सैन्यात दाखल होण्याचा प्रस्ताव बाबरनं ठेवला होता मेवाती यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर मुघल सैन्याशी लढण्यासाठी त्यांनी मेवाडचे राजा राणा संग यांच्याशी हातमिळवणी केली. खानवामध्ये झालेल्या युद्धात मेवाती यांना हौतात्म्य प्राप्त झालं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाला बदल? कमला हॅरिसमुळे ट्रम्प यांना फायदा की तोटा?
भाजपा 'या' राज्यात मुस्लीम राजाच्या नावावर मतं का मागत आहे?
NDTV Poll of Polls lok sabha elections 2024 exit poll NDA modi government again India alliance
Next Article
NDTV Poll of Polls : देशात पुन्हा 'मोदी सरकार'?, एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं
;