- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीत महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा केली आहे
- भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे
- फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त ठिकाणी महायुती व्हावी यासाठी प्रयत्न असेल असं सांगितलं.
महापालिका निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली. त्यानंतर लगेचच एक मोठी राजकीय उलथापालथ घडल्याचं समोर आलं. ती म्हणजे महायुती तुटल्याची. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. महायुती तुटल्याची घोषणा दुसरी तिसरी कुणी नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली. ही महायुती पुणे महापालिका निवडणुकीत मोडली असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार आणि आपल्यात याबाबत बोलणी झाली असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका स्वबळावर लढणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आपल्या सोबत असेल हे सांगायला ते विसरले नाहीत.
पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहेत. पुण्यात दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पुण्यात महायुती असणार नाही हे स्पष्ट झालं आहे. पुण्यात जरी महायुती होणार नसली तरी जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. काही ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र असेल तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र असेल असं त्यांनी सांगितलं. या लढती मैत्रिपूर्ण होतील असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महायुतीचं सरकार राज्यात चांगलं काम करत आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचा कौल शहरातले नागरिक आम्हालाच देतील असा विश्वास ही फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेत भाजपने चांगले काम केले आहे. त्यामुळे इथली जनता भाजपलाच कौल देईल असं ही ते म्हणाले. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक नेते सध्या इच्छुक आहेत. पण कोणाला घ्यायचे याचा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेते घेतली असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र शिंदे आणि आमच्यात एकमेकांचे नेते घेतले जाणार नाहीत असं फडणवीसांनी पुन्हा एकदा सांगितलं.
या महापालिका निवडणुकीत शिवसेना आमच्या सोबत सगळ्याच ठिकाणी असेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले काय आणि आले नाहीत काय आम्हाला काही फरक पडणार नाही असंही फडणवीस म्हणाले. काँग्रेस जरी त्यांच्या सोबत आली तरी मुंबईकर जनतेने भाजपकडे सत्ता देण्याचे निश्चित केल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबईत महायुतीची सत्ता येणार हे नक्की आहे असं ही ते म्हणाले. दरम्यान मतदार यादीच घोळ आहे हे आम्ही ही दाखवून दिलं आहे. पण त्यामुळे निवडणुका पुढे ढकलणे योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world