'उबाठा' ला बाळासाहेब ठाकरेंची लाज वाटते, शिवसेनेचा थेट आरोप

'या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि विचारांचा एकदाही उल्लेख केलेला नाही, कारण त्यांना बाळासाहेबांची लाज वाटते.'

Advertisement
Read Time: 3 mins
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यावर शिवसेनेनं टीका केलीय.
मुंबई:

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला वचनमाना नसून राहुल गांधी आणि सोनिया गांधीला दिलेला वचननामा आहे. या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि विचारांचा एकदाही उल्लेख केलेला नाही, कारण त्यांना बाळासाहेबांची लाज वाटते,' असा थेट आरोप शिवसेनं केलाय.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठीचा वचननामा गुरुवारी ( 25 एप्रिल) प्रसिद्ध केला.  या वचननाम्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. 

'उबाठा' पक्षाचा वचननामा हा बोलबच्चन नामा आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची परवानगी घेऊन  हा जाहीर केलाय.  लोकसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा गुरुवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात आला. या वचननाम्यात बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्यात आलीय. या वचननाम्यात बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्यात आली आहे. हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे, सावरकर आणि मराठी माणसांचा विसर पडला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर आरोप

शिवसेनेनं 'उबाठा' पक्षानं प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यातील प्रत्येक मुद्यावर टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. 'आपल्या बापाचे नाव आणि कर्तृत्व विसरणारा मुलगा जनतेसमोर जे वचन देत आहे त्या वचनावर विश्वास कसा ठेवणार? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आलाय. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भारत रत्न मिळणार नाही असे संकेत राहुल गांधींनी दिले असावेत, म्हणूनच बाळासाहेबांना भारत रत्न मिळावे ही मागणी बोलबच्चन नाम्यात नाही. वचननाम्यात सावरकरांचा उल्लेख आणि त्यांच्यासाठी भारत रत्नची मागणी वगळण्यात आलेली आहे. सावरकरांची उद्धव ठाकरेंना लाज वाटत असावी, 'असा टोलाही शिवसेनेनं लगावलाय. 

'समान नागरी कायद्याचा विरोध काँग्रेस करत आहे आणि त्यांना घाबरुन या विषयावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदललेली दिसते. उद्धव ठाकरे आता स्पष्टपणे समान नागरी कायद्याचा विरोध करताना दिसत आहेत.

( नक्की वाचा : 'उबाठा' च नाही तर भाजपासह 'या' पक्षांनाही निवडणूक आयोगानं बजावलीय नोटीस )
 

महबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुलांच्यामध्ये बसणारे उद्धव ठाकरे यांचा समान नागरी कायद्यावर यू-टर्न या बाळासाहेबांच्या मूळतत्वांचा अपमान असून देशविरोधी कृतीसुद्धा आहे, मुंबईचे वैभव हे कोणामुळे हरवले पहिले याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे.

Advertisement

मुंबईच्या नाचक्कीला उद्धव ठाकरे जबाबदार

बाळासाहेबांचे वैभव गमावून काँग्रेसला देशात अच्छे दिन यावेत, यासाठी दिवस आणि रात्र कष्ट घेणारे महाराष्ट्राचे वैभव परत आणू पाहत आहेत. मुंबई महानगर पालिकेची तिजोरी लुटताना मुंबईची ओळख जगामध्ये सर्वात भ्रष्ट महानगरपालिका आणि खड्ड्यात रस्ते असणारे शहर म्हणून ओळख करुन देणारे मुंबईचे वैभव पुन्हा परत आणणार आहेत.  मुंबईचे वैभव हे खिचडी घोटाळा, रस्ते घोटाळा, कोविड जम्बो सेंटर घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा यामुळे जगभरात मुंबईची नाचक्की झाली आणि त्यासाठी फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत.

Advertisement

बेरोजगारांसाठी जाहीरनाम्यात फक्त एक ओळ आहे. पण रोजगार देणार कसे, याची माहिती नाही. ज्यांनी महाराष्ट्र फक्त हेलिकॉप्टरमधून पाहिला आहे त्यांना गोरगरिब, बेरोजगारांची कल्पना नाही. आपल्या बेरोजगार मुलासाठी मुख्यमंत्र्यांची खूर्ची मिळवणे हाच त्यांचा फुलटाईम रोजगार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : काँग्रेसनं 80 वेळा घटना बदलली पण, उद्धव ठाकरे... भाजपाचा थेट आरोप )

महाराष्ट्र कोव्हिड मृत्यूंमध्ये पहिल्या क्रमांकावर कसा पोहोचला?  घरात बसून माझे कुटुंब माझ जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील लोकांना वाऱ्यावर सोडले होते.अवघ्या दोन वर्षात २०० कोटी रुपये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांना पोहोचवण्याचे पुण्य एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून घडले आहे.

बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर पक्षाची घटना बदलून त्यात केलेले बदल निवडणूक आयोगापासून लपवून सत्तेचे केंद्रीकरण उद्धव ठाकरेंनी केले. त्यापूर्वी पक्षात दोन केंद्र होती, एक बाळासाहेब आणि दुसरे शिवसैनिक. शिवसैनिकांचा अधिकार हिरावून ते अधिकार आपल्या मुलाला, नातेवाईकांना देणारे आज सत्तेचे विकेंद्रीकरण करा असे म्हणत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे, असा आरोप शिवसेनेनं केलाय. त्याचबरोबर औद्योगिक धोरण आणि महिलांचा सन्मान या विषयावरही शिवसेनेनं 'उबाठा' पक्षाच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे.