- राहुरीच्या भागरथीबाई माध्यमिक विद्यालयाची स्कूल बस अपघातग्रस्त झाली असून ती रस्त्याच्या कडेला कोसळली
- अपघाताच्या वेळी बसमध्ये पन्नास विद्यार्थी होते, ज्यांपैकी दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत
- बसच्या गाडीचा पाटा तुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले
सुनिल दवंगे
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणारी स्कूलबस अपघातग्रस्त झाली आहे. भागरथीबाई माध्यमिक विद्यालयाची ही स्कूल बस होती. ही बस रस्त्याच्या कडेला खोल बाजूला कोसळली. शिवाय ती पलटी झाली. अपघात झाला त्यावेळी या बसमध्ये जळपास 50 विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातात 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राहुरी तालुक्यातील कोंढवड गावाजवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. भागरथीबाई माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीचा पाटा तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. शेवटी ही बस रस्त्याच्या कडेला खाली कोसळली. बसने यावेळी पलटी ही मारली. अपघात झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्व विद्यार्थी रडू लागले. त्यामुळे तिथे एकच गोंधळ निर्माण झाला.
अपघातावेळी बसमध्ये 50 विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पालक, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी झाल्याने परिसरात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. शिवाय अपघाताची बातमी पोलीसांना दिली. तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात ही हलवण्यात आलं होतं. या अपघातानंतर स्कूलबसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर विद्यार्थी ही घाबरलेल्या स्थितीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने पालकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांचे नशिब चांगले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world