पुणे येथे पार पडलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आता जिल्हा पातळीवर संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा एकदिवसीय रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीची स्पष्ट दिशा निश्चित करत "शत-प्रतिशत भाजप"चे ध्येय गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी, तर रत्नागिरीत दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका पार पडल्या.
बूथ पातळीवर मजबूत बांधणी अन् विकासकामांचा प्रचार
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरून प्रत्येक गावात आणि विशेषतः बूथ पातळीवर तन, मन, धन अर्पण करून पक्षाची मजबूत बांधणी करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात. बैठकीत SIR., सेवा संकल्प अभियान आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
कणकवली आणि रत्नागिरीतील 'भाजपा भवन'ची पाहणी
रविंद्र चव्हाण यांनी कणकवली आणि रत्नागिरी येथे उभारल्या जाणाऱ्या 'भाजपा भवन' या जिल्हा कार्यालयांच्या कामाची पाहणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संकल्पनेतून उभारली जाणारी ही कार्यालये केवळ प्रशासकीय केंद्र न राहता "राष्ट्रसेवेची कार्यशाळा आणि जनआकांक्षांचे व्यासपीठ" म्हणून विकसित व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच उत्तर रत्नागिरीत विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची ताकद अधिक वाढली आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या दौऱ्यात मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे, माजी आमदार विनय नातू, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या या दौऱ्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पक्षाच्या आगामी वाटचालीला स्पष्ट दिशा मिळाली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद यांची सांगड घालत शत-प्रतिशत भाजपाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world