गिरीश महाजनांच्या पत्नीची नगराध्यक्षपदी तर मुख्यमंत्र्यांच्या भावाची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड

Girish Mahajan's Wife Elected Unopposed: जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान होण्याआधीच काही जागांचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विसपुते यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या उमेदवार प्रतिभा झालटे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ललवाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

नक्की वाचा: 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला; वाचा A to Z माहिती

अमरावतीत भाजपने खाते उघडले

अमरावतीत भाजपने निकालापूर्वीच आपले खाते उघडले आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. कलोती यांचा सामना काँग्रेससह 9 उमेदवाराशी होणार होता. या सगळ्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे.  अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांना, प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासह इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते.  कलोती यांच्या विजयानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे. 

नक्की वाचा:  पत्नीला जिवंत जाळल्याचा आरोप, जेलमध्ये वास्तव्य, तरीही 'या' पक्षाने दिली उमेदवारी

भाजपचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेने फोडला, हिंगोलीत अजब गजब प्रकार

हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभा असलेला भाजपचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपल्याकडे वळवला आहे. प्रभाग क्रमांक 16 ब मधून भाजपने भास्कर बांगर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भास्कर बांगर यांनी ऐनवेळी माघार घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.  भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घेत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे मानले जात आहे.   

Topics mentioned in this article