
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या आईवडिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप करण्यात आला आहे. वैष्णवीच्या सासूचा जालिंदर सुपेकर हे भाऊ आहे. सुपेकर यांच्याविरोधात 500 कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा खटला दाखल करण्यात आला असून तो कोर्टात प्रलंबित आहे. अशातच आता त्यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुपेकरांविरोधातील आरोपांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. सुपेकर मात्र या सगळ्यावर मौन बाळगून आहेत. NDTV मराठीने शुक्रवारी सकाळी त्यांना गाठले आणि प्रतिक्रिया विचारली यावर त्यांनी NDTV मराठीचा माइक झिडकारून निघून जाणं पसंत केलं.
वैष्णवी हगवणेचे मामेसासरे असलेल्या जालिंदर सुपेकर यांचा मेहुणा असलेल्या शशिकांत चव्हाण याची कोट्यवधींची संपत्ती असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला होता. पोलीस निरीक्षक असलेले शशिकांत चव्हाण हे जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे लागतात. साधा पीआय असलेल्या माणसाकडे इतकी संपत्ती कुठून आली ? या संपत्तीमध्ये जालिंदर सुपेकर यांचा काही सहभाग आहे का ? असे प्रश्न उपस्थित करत चव्हाण याच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी केली जावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
नक्की वाचा :साध्या PIकडे इतकी संपत्ती आली कुठून? जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याची ईडी चौकशी करा!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकरांवर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 'आका' असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याला बीडमध्येच ठेवण्यात सुपेकरांचा हात असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. सुपेकर तुरुंगातून आरोपींकडे पैशांची मागणी करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. शस्त्र परवाने देण्यासाठीही जालिंदर सुपेकर यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचाही आरोप केला जात आहे.
नक्की वाचा : 'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
इतके सगळे गंभीर आरोप असताना सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले जात नाही असा सवाल केला जात आहे. NDTV मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांना हा सवाल विचारण्यात आला. यावर कदम यांनी म्हटले की, "कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही मात्र चौकशीतून उघड होणाऱ्या गोष्टीनंतर पुढील कारवाई केली जाईल. चुकीच्या गोष्टींना मुख्यमंत्री कधीही पाठीशी घालणार नाहीत. आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई कशी करणार? जेलचे प्रमुख असताना जे आरोप करण्यात आले होते, त्याबाबतीत काही गोष्टी कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टाचे आदेश पाळणं हे बंधनकारक आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर कारवाई केली जाईल. "
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world