
सौरभ वाघमारे, सोलापूर
Solapur News : आंध्र प्रदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसोबत विचित्र प्रकार घडला आहे. शिर्डीहून गाणगापूर प्रवासादरम्यान या 25 ते 30 भाविकांच्या बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. परराज्यात मोठं संकट ओढावल्याने या भाविकांना अश्रू अनावर झाले. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेशमधील येलूर जिल्ह्यातील मकिनवारगुडम गावाचे रहिवासी आहेत. 800-850 किमीचा प्रवास करून हे भाविक शिर्डीत ट्रेनने पोहोचले होते. तेथून गाणगापूरला जाण्यासाठी एका खासगी बसने ते सोलापूरपर्यंत आले होते. यासाठी त्यांनी जवळपास 15 हजार रुपये दिले.
(नक्की वाचा - Thane News : हनीट्र्रॅपमध्ये अडकला इंजिनिअर! नौदलाची गोपनिय माहिती पाकिस्तानला शेअर केल्याबद्दल अटक)
मात्र सोलापुरात पोहोचल्यानंतर त्यांनी आपलं सामान तपासलं तर अनेकांच्या बॅगा गायब झाल्या होत्या. बॅगासह त्यातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. यात दागिने, मोबाईल, कपडे, पैसे यासारखं सामान होतं. आपल्या बॅगा चोरीला गेल्याने प्रवासी महिलांना अश्रू अनावर झाले. बस चालकाने दिलेल्या माहितीनुसार बस केवळ दोन ठिकाणीच थांबली होती. त्यामुळे नेमकं काय झालं, याची कल्पना नाही.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video ))
आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर सर्वांनी फौजदार चावडी पोलीस गाठलं आणि तिथे आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असल्याने पोलिसांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा देखील येत आहे. दरम्यान,तेलगू - मराठी दुभाषिकच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world