
राज्यात आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती एकत्र निवडणूका लढवण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आमदारांनी स्वातंत्र्य लढण्याचा विचार मांडला आहे. जास्त जागा हव्या असतील तर एकटं लढायची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकला चलो रेच्या भूमीकेत दिसत आहे.
मुंबई काँग्रेस तर्फे रविवारी जनसभा घेण्यात आली. या सभे दरम्यान काँग्रेस पक्षाचे दोन आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे. त्याच कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये निवडणूका लढल्या गेल्या तर मुंबईत काँग्रेस पक्षाला कमी जागा दिल्या जातील. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जास्त असल्याने ते जागा जास्त मागणार. या कारणावरून काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहे.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी ही एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना या गोष्टीचीच री ओढली आहे. संजय राऊत हे वारंवार म्हणतात इंडिया आघाडी ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होती. छोट्या निवडणुकीसाठी सगळे स्वतंत्र लढतील त्यानुसार आम्ही आमच्या तयारीला लागलो आहोत. मात्र हा सगळा निर्णय शेवटी दिल्ली हाय कमांड घेतील असेही असलम शेख म्हणाले. मात्र सध्या तरी मुंबई काँग्रेसने एकटे लढण्याची तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे यांची साथ हवी आहे. त्यासाठी ते कमालीचे सकारात्मक दिसत आहेत. त्यामुळे ऐन वेळी दगा फटका नको म्हणून काँग्रेसने आतापासूनच स्वबळाची तयारी सुरू केली आहे. जर राज ठाकरे उद्धव ठाकरें बरोबर आले तर काँग्रेसला मिळणाऱ्या जागांमध्ये आणखी घट होवू शकते त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा असा काँग्रेस नेत्यां समोर प्रश्न आहे. त्यामुळे स्वबळाची भाषा आता काँग्रेसकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world