
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. हल्ल्यानंतर भारताने सर्वप्रथम सिंधू नदीचे पाणी थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा आयात-निर्यात व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते आणि राजनैतिक अधिकारी विचित्र आणि हास्यास्पद विधाने करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असेच एक हास्यास्पद विधान केले आहे. त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, जर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कारवाई केली, तर पाकिस्तान त्यांच्यावर अणुबॉम्ब हल्ला करेल. पाकिस्तानी राजदूतांचे हे विधान म्हणजे त्यांची आणखी एक पोकळ धमकी समजली जात आहे.
यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा दिला होता की, जर भारताने "सिंधू जल कराराचे उल्लंघन" करून सिंधू नदीचे पाणी रोखले तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू करार स्थगित करण्याच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच बिलावल भुट्टो यांनी भारताच्या सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. त्यात एकतर आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. त्यामुळेच त्यांचे सैन्य सतत नियंत्रण रेषेचे (LoC) उल्लंघन करताना दिसत आहे, ज्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने जम्मूच्या पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी अखनूरपासून ते काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्लापर्यंत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार करण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानकडून 2018 मध्ये 2140 वेळा, 2019 मध्ये 3479 वेळा आणि 2020 मध्ये 5133 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान नऊ दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्यांच्याकडून सतत गोळीबार होत आहे, ज्याला सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. एकंदरीत भारताने पाकिस्तान विरोधात उचलेले पाऊल त्यांच्या जिव्हारी लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांपासून ते अगदी अधिकाऱ्यांपर्यंत अशी वक्तव्य केली जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world