
रिजवान शेख, ठाणे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आता भाजपही आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. महायुतीमधील दोन्ही प्रमुख पक्ष एकत्र आहेत, असे नेते जाहीरपणे सांगत असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने ठाणे शहरातील इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्याचे कारण
भाजपाकडून इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या फॉर्मच्या माध्यमातून त्या उमेदवाराने आपल्या प्रभागात किती काम केले आहे, हे तपासले जाणार आहे. उमेदवाराच्या कामाची आणि प्रभागातील लोकप्रियतेची पडताळणी केल्यानंतरच त्याला 'एबी फॉर्म' दिला जाईल. या प्रक्रियेमुळे उमेदवाराची निवड गुणवत्तेवर आधारित असेल, असे भाजपचे धोरण दिसत आहे.
(नक्की वाचा- Sharad Pawar News: पवार कुटुंबाचा यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, कारण...)
ठाणे शहराचा पुढचा महापौर कोण?
येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाण्याचा महापौर नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने ठाण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, महिला मोर्चा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी पक्षाच्या वर्तक नगर येथील कार्यालयात माजी नगरसेवकांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
(नक्की वाचा: Pune News: पुरंदर एअरपोर्ट वादात आता शरद पवारांची उडी, केलं मोठं वक्तव्य)
यापूर्वी, शिवसेना शिंदे गटानेही स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. अलीकडेच शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची आनंद आश्रम येथे एक बैठक झाली होती. ज्यात त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केल्यामुळे, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की नाही, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world