Mira Road Accident News: रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा फटका बसून पुन्हा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मीरा रोडच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणात प्रशासनावर कारवाई करण्याऐवजी काशिगाव पोलिसांनी मृत तरुणावरच गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मीरा रोड येथील पूनम गार्डन, राज अँटीला इमारतीत राहणारा कुशल मृगेश नाडर हा तरुण मंगळवारी पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होता. तो भाईंदरकडून काशिमीराच्या दिशेने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर, जिथे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे, तिथे हा अपघात घडला.
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
काशिगाव मेट्रो स्थानकाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यातील एका खड्ड्यात कुशलच्या दुचाकीचे चाक गेल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि तो जोरदार खाली कोसळला. दुर्दैवाने या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकमतने याबाबतच वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Buldhana News: डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू)
पोलिसांकडून गुन्हा दाखल
या अपघातानंतर काशिगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, कुशल नाडर हा दुचाकी चालवताना हेल्मेट न घालता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत होता. तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हयगय केली. या कारणांमुळे पोलिसांनी मृत कुशल नाडर याच्यावरच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतावर गुन्हा दाखल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world