
ऋतिक गणकवार, मुंबई
Mumbai News : मुंबईत अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 'ह्युमन बॉम्ब' स्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या मेसेजमध्ये, 'लष्कर-ए-जिहादी' नावाच्या एका दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्याने दावा केला आहे की, 34 वाहनांमध्ये 'ह्युमन बॉम्ब' लावण्यात आले आहेत आणि त्यांच्या स्फोटानंतर संपूर्ण मुंबई शहर हादरून जाईल.
(नक्की वाचा- Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय)
मेसेजमध्ये 400 किलो आरडीएक्सचा उल्लेख
धमकीच्या मेसेजमध्ये आणखी काही गंभीर दावे करण्यात आले आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. तसेच, 400 किलो आरडीएक्सच्या स्फोटात सुमारे 1 कोटी लोकांचा जीव जाईल, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे.
अनंत चतुर्दशीच्या काळात शहरात मोठी गर्दी असते, त्यामुळे अशा वेळी आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही जोखीम न घेता तातडीने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस या मेसेजची गंभीरता तपासत आहेत आणि शहराच्या प्रमुख ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Mumbai Accident: 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू)
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हॉट्सॲप नंबरवर यापूर्वीही अशा प्रकारचे धमकीचे मेसेज आले होते, ज्यांचा तपास केला असता ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, यावेळी अनंत चतुर्दशी आणि शहरात असलेल्या गर्दीमुळे पोलीस कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा दाखवत नाहीत. मुंबईची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठीही पोलीस काळजी घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world