
सुरज कसबे, प्रतिनिधी
पुणे शहरातील आयटी हब हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या लाखो नोकरदारांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे शहराचं 'आयटी हब' असलेल्या हिंजवडीच्या दिशेने जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रज-किवळे बाह्यवळण मार्गावर अर्थात मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) आजपासून अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कात्रजपासून पुढे प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
नऱ्हे ते किवळे दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे बाह्यवळण मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने मल्टी असेक्ल, ट्रेलर्स आणि कंटेनर्ससारखी मोठी वाहनेही याच रस्त्याचा वापर करतात. यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले होते.
नक्की वाचा - Rain in Diwali : यंदा दिवाळीतही धो धो; राज्यातील 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा
अवजड वाहनांवर कधी आणि कुठे असेल बंदी...
सकाळी 8 ते 11 या वेळेत कात्रजकडून किवळेकडे अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणारी लेन जी शिंदेवाडी टोलनाका
संध्याकाळी 5 ते 9 च्या दरम्यान किवळेकडून कात्रजच्या दिशेने अर्थात मुंबईहून पुण्याकडे येणारी लेन जी उर्सेवाडी टोलनाका किंवा वडगाव फाट्यापासून पुढे आहे .
या प्रवेशबंदीमुळे हिंजवडीकडे जाणारे तसेच तेथून घरी परतणारे नोकरदार आणि प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित आणि जलद होणार आहे. दरम्यान या बंदीतून पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल तसेच पुणे शहराच्या अंतर्गत भागात माल घेऊन जाणारी-येणारी आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने या बंदीमधून वगळण्यात आली आहेत. पुणेकरांच्या सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world