
- डॉ. अपर्णा गोविल भास्कर
Weight Loss Tips News: भारतामध्ये लठ्ठपणाची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत आहे. वाढलेल्या वजनामुळे केवळ शारीरिक सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होत नाही तर शरीराच्या अवयवांवरही याचे दुष्परिणाम होतात. लठ्ठपणासारखा आजार मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि सांधेदुखी यासारख्या आजारांना आयते आमंत्रण देतो. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. पण वजन घटवण्यासाठीचा कोणताही शॉर्टकट हा धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय.
शरीरातील शुगरची पातळी कमी करण्यासाठी जी औषधे खाण्याचा सल्ला दिला जातो, त्यामध्ये बऱ्याचदा हेवी मेटल्स म्हणजे धातूंचा समावेश असू शकतो. याचे दुष्परिणाम थेट किडनी, यकृत, नसा किंवा डोळ्यांवर होऊ शकतात. तसेच वेटलॉससाठीच्या औषधांमध्ये डायुरिटिक्स म्हणजे लघवीतून वजन किंवा साचलेले पाणी जाण्याच्या ज्या गोळ्या असतात, त्या मिश्रित असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याविना तसेच अतिप्रमाणात या गोळ्या खाल्ल्या तर शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. वजन कमी होण्यासोबतच मूत्रपिंड तसेच स्नायूंवरही याचा दुष्परिणाम जाणवू शकतो. कारण अशा औषधांमध्येही धातू वापरलेले असते.
Mounjaro Injection वेटलॉस इंजेक्शनबाबत तज्ज्ञांकडून इशारा
भारतात अलिकडेच लाँच झालेल्या वजन कमी करण्याची (Weight Loss Injection) औषधे गेम चेंजर असल्याचा दावा केला जात आहे. पण याचा वापर हानिकारक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. मोंजारो (Mounjaro) आणि वेगोव्ही (Novo Nordisk Wegovy Drug) यासारख्या वजन कमी करण्याच्या औषधांनी केलेल्या चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दाखवले आहेत आणि ही औषधे घेत असताना शरीराचे एकूण वजन सुमारे 15 टक्के ते 20 टक्के कमी झाल्याचे आढळलंय. हे वजन कमी करण्याच्या आणि लठ्ठपणाशी संबंधित कोमॅार्बिडीटीज कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. ही औषधे टाइप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जातात. उच्च रक्तदाब, हृदयरोगाचा धोका कमी करणे, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया अशा लठ्ठपणाशी संबंधित इतर समस्याही दूर करू शकतात.
(नक्की वाचा: Weight Loss: एक शॉट आणि लठ्ठपणा गायब, Novo Nordisk Wegovy ची किंमत ऐकून हैराण व्हाल)
... तर पुन्हा वजन वाढेल का?
शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांव्यतिरिक्त ही औषधे वापरणे बंद केल्यानंतर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आलंय की, औषधे बंद केल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णांचे वजन पुन्हा वाढलंय. वजन कमी होण्याच्या परिणामांबाबत किंवा दुष्परिणामांबाबत दावा करणारा कोणताही अहवाल सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे दीर्घकाळासाठी अशा औषधांचे सेवन करणे चुकीचे आहे. या औषधांच्या सेवनामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, गॅस होणे, पोट फुगणे, अतिसार इत्यादी पचनाशी संबंधित समस्या आढळून येतात. यामुळे पित्ताशयामध्ये खडे तयार होणे किंवा स्वादुपिंडाला सूज येण्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. थायरॉइडच्या कॅन्सरचा धोका वाढल्याचीही माहिती काही अहवालांमध्ये उपलब्ध आहे. थायरॉइड कॅन्सर किंवा MEN II सिंड्रोमचा कौटुंबिक इतिहास असलेल्या रुग्णांमध्ये याची शिफारस केली जात नाही. यामुळे आतड्यांची हालचाल मंदावणे (गॅस्ट्रोपेरेसिस) देखील होऊ शकते आणि अॅसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेची योजना आखत असलेल्या रुग्णांनी अशा प्रकारच्या औषधांचे सेवन टाळले पाहिजे.
(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)
लठ्ठपणा होण्यामागील कारणे
लोकांची मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लान फॉलो करतात. पण लठ्ठपणा हा एक असा आजार आहे जो आनुवंशिकता, हार्मोनल समस्या, आतड्यांमधील सूक्ष्मजीव, जीवनशैली, पित्त-आम्लाची समस्या इत्यादी कारणांमुळे उद्भवू शकतो.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोग यासारख्या इतर आजारांप्रमाणेच लठ्ठपणावरही टप्प्याटप्प्याने उपचार करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात निरोगी आहार आणि जीवनशैलीद्वारे ते रोखता येऊ शकते. गंभीर लठ्ठपणासाठी त्याच्या टप्प्यानुसार औषधोपचार, एंडोस्कोपिक थेरपी किंवा काही प्रकरणांमध्ये बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय वापरावा लागू शकतो. सध्या औषधांच्या किंमती प्रचंड आहेत पण परदेशांच्या तुलनेत ही औषधे भारतात स्वस्त किंमतीत मिळत आहेत.
(नक्की वाचा: High Cholesterol Remedy: कोलेस्टेरॉल पटकन होईल गायब, हृदय लोखंडासारखे मजबूत होईल; या 7 चमत्कारिक पदार्थांचे करा सेवन)
लठ्ठपणावर वेळीच आळा घालणे आवश्यक
भविष्यात जेनेरिक औषधे बाजारात आल्यावर औषधांचा खर्च कमी होऊ शकेल. सध्या बाजारात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (HPF) मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जी मोठ्या कॉर्पोरेट्स ॲाफिसमध्येच नव्हे तर मुलांकरिता देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कार्बोनेटेड पेय ही तर खेड्यापाड्यांमधील लहान दुकानांमध्ये देखील आढळतात. दुसरी समस्या म्हणजे हल्ली मोठ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना आठवड्याभरामध्ये 90 तास काम करावे लागते. यामुळे त्यांना स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मुलांवर इतका शैक्षणिक दबाव असतो की त्यांच्याकडे खेळण्यासाठीही वेळ नसतो. लठ्ठपणाची समस्या प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि यावर आळा घालण्यासाठी वेळीच योजना आखण्याची आवश्यकता आहे.
(लेखिकेबाबतची माहिती:सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, मेटाहील - लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर, मुंबई; सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स, मुंबई)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world