विष्णू बुर्गे, लातूर
लातूर जिल्ह्यातील वडवळ येथील 26 वर्षीय विवाहितेचा भोपाळमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. सासरच्या छळामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत, दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी नळेगाव पोलीस चौकीत घेतला आहे. कल्पना सतीश कसबे असं मृत महिलेचं नाव आहे.
माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून आणि घरगुती वादातून कल्पनाचा छळ होत होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. अशातच कल्पनाचा भोपाळ येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कल्पना यांचा विवाह भोपाळ येथील सतीश कसबे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून माहेरून पैसे आणण्यासाठी कल्पना यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला होता. याच वादातून त्यांचा भोपाळ येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस चौकीत नातेवाईकांचा संताप
कल्पना यांचा मृतदेह भोपाळवरून नळेगाव पोलीस चौकीत आणण्यात आला. मात्र, सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळूनच कल्पना यांनी जीव गमावला असल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक झाले. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
(नक्की वाचा- Thermos Bottles: सावधान! 3 जणांची दृष्टी गेली, अनेक जण जखमी; 'थर्मॉस'च्या लाखो बॉटल्स आणि जारमध्ये गंभीर दोष)
परिसरात तणावाचे वातावरण
आंदोलन आणि नातेवाईकांच्या संतापामुळे नळेगाव पोलीस चौकी परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. हुंडाबळी किंवा छळाचा हा प्रकार आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world