- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुटुंबीयांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले
- सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली
- जय पवार यांना बारामती आणि पुणे ग्रामीण क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे
देवा राखुंडे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवारांच्या कुटुंबात जबाबदाऱ्यांचे वाटप केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. कोणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी असेल हे ही निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षात प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे महत्वा कमी होणार का याची चर्चा आपोआप सुरू झाली आहे. पक्षावर आपली पकड अधिक भक्कम करण्याकडे सुनेत्रा पवार यांनी आणखी एक पाऊल टाकले आहे. त्या दृष्टीने त्यांनी पक्षात आपल्या दोन्ही मुलांना महत्वाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे.
28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर आली. अजित पवारांच्या पाश्चात्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सुनेत्रा पवारांना पुढे घेऊन जायचा आहे. यासाठी कुटुंबातच जबाबदाऱ्यांचे वाटप निश्चित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन पातळ्यांवर वेगवेगळी जबाबदारी दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत. अजित पवारांचं राहिलेलं अर्धवट स्वप्न आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी महाराष्ट्राची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर आहे.
पक्षाची धुरा खांद्यावर घेताच सुनेत्रा पवार आपलं सर्व दुःख बाजूला सारून बारामतीकरांसह राज्याचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या जनता दरबाराची परंपरा ही त्यांनी पुढे कायम ठेवली. सुनेत्रा पवार या आधी सामाजिक कार्यात सक्रीय होत्या. 2009 ते 2010 मध्ये एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया ची स्थापना करून सुनेत्रा पवार बारामतीत समाजकार्यात सक्रिय झाल्या. जेव्हा अजित पवार महाराष्ट्राचे राजकारण करायचे तेव्हा पडद्यामागून सुनेत्रा पवार महत्त्वाची भूमिका बजावायच्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार गेले 16 वर्ष बारामतीकरांशी जोडल्या गेले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत झाली. यात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. मात्र यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांना राजकारणात बढती मिळाली. बारामती तालुक्याच्या आणि राज्याच्या राजकारणात त्या सक्रिय झाल्या. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चार दिवसातच सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. आता सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत.सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर आता राज्याचं ओझ असल्याने साहजिकच सुनेत्रा पवार यांना बारामतीला तितकासा वेळ देता येणार नाही.
यासाठी विशेष करून बारामतीची आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी जय पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आता प्रत्येक मंगळवारी जय पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेणार आहेत. बारामतीकरांचे प्रश्न समजून घेत त्याचा तात्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न जय पवारांकडून केला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय झाले आहेत. बारामतीच्या राजकारणासह जिल्ह्याचं राजकारण जय पवार दादांकडून समजून घेत होते. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पार पडलेल्या बारामती पोटनिवडणुकीत आईच्या प्रचाराची धुरा जय पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बारामती तालुका पिंजून काढत मतदारांना एक विश्वास दिला.
पवार कुटुंबातील महत्त्वाचा चेहरा असलेले पार्थ पवार ही अजित पवारांच्या निधनानंतर राजकारणात चांगलेच सक्रिय झालेत. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागली. त्यामुळे पक्षाला घरातूनच तरुण नेतृत्व मिळालं आहे. पार्थ पवार हे काहीसे आक्रमक आहेत स्पष्टभक्तेपणा आणि तातडीची निर्णय प्रक्रिया हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अगदीच बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसला आव्हान द्यायला ही पार्थ पवार कमी पडले नाहीत. आता मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी पार्थ पवार यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे संपूर्ण पक्षच आता पवार कुटुंबानी आपल्या ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world