वसई-विरार परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा येथील सेंट्रल पार्क, तुळिंज ब्रिज तसेच धानीव बाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. तुळिंज ब्रिज परिसरात जलभरावामुळे वाहतूक संथ झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धानीव बाग परिसरात गटारे वेळेत साफ न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, वारंवार उद्भवणाऱ्या जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.