Navi Mumbai : नवी मुंबईत परिस्थितीने चिंताजनक स्वरूप धारण केलं असून पुन्हा एकदा एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. घणसोली आणि कोपरीगाव परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुली गायब झाल्या असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
१० दिवसांपूर्वी सीवूड येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी पॉस्को गुन्ह्यातील पीडित असल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. ही मुलगी सीवूड रेल्वे स्थानकाच्या हद्दीतून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी NRI पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी उरण, एपीएमसी, रबाळे आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच वेळी चार मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला. या प्रकरणावर विविध माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी NDTV शी बोलताना सांगितले.
नवी मुंबईतून आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. यापैकी ७० ते ८० टक्के मुली घरी परतल्या असल्या तरी सुमारे ३० टक्के मुली अजूनही बेपत्ता असल्याचे वास्तव समोर आले आहे. हा आकडा केवळ नवी मुंबईचा असून राज्यभरातील बेपत्ता मुलींची संख्या अधिक धक्कादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या गंभीर विषयाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विचारणा केली होती. यावर नागपूर अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'हा विषय अत्यंत गंभीर असून यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल,' असं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, आज पुन्हा नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मुली बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. घणसोली येथील १६ वर्षीय मुलगी ही १३ डिसेंबर रोजी सकाळी कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघाली, मात्र ती परतली नाही. तर कोपरीगाव येथील अल्पवयीन मुलगी ८ डिसेंबर रोजी ट्युशनला जाते सांगून घराबाहेर पडली असून ती अद्याप बेपत्ता आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एपीएमसी पोलिसांकडून तपास सुरू असून नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे शासन पातळीवर गंभीर दखल घेतली जात असताना दुसरीकडे मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना सुरूच असल्याने नवी मुंबईतील पालकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
१ जानेवारी २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान विविध कारणांनी मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील कारणं पुढीलप्रमाणे...
पालक रागावल्याने - ११४
प्रेमप्रकरण - १२८
नातेवाईकांकडे गेल्या - १०३
फिरायला गेले - ६३
मतिमंद - १
मैत्रिणीकडे गेल्या - ४८
एडीआर - १
एकूण = ४५८
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
