आधीच अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री असताना राज्यात पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचं मान्य केलं. हा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोक सभेत मांडला त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कालच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले तर आता दुसरीकडे मुंडेंच्या काळातील विमा घोटाळ्याचा देखील आता चौकशी होणार आहे.