2 months ago
मुंबई:

गेल्या दोन दिवसांपासून कोकणसह (Heavy Rain) राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू (Rain Live Update) आहे. रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर दिसतोय. पुढील 3-4 तास पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Department of Meteorology) वर्तवला आहे. मुसळधार पावसाने सी-लिंक परिसरात दृश्यमानता देखील घटली आहे. पश्चिम रेल्वेवरील स्लो लाईनवर झाड कोसळल्याने लोकल काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी झाड लवकर बाजूला केल्यानंतर पुन्हा एकदा लोकल सेवा सुरळीत झाल्याची माहिती आहे. दादर-प्रभादेवी दरम्यान मार्गावर झाड कोसळलं होतं. त्यामुळे विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद झाली होती


 

Jul 14, 2024 15:58 (IST)

चिपळूणमधील वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे चिपळूणमधील वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  बाजारपुलाजवळील नाईक कंपनी परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे. 

दरम्यान कोळकेवाडी धरणाच्या मशीन बंद आहेत. दुपारी 4 वाजून 41 वाजता भरती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. NDRF, नगरपालिका , महसूल व पोलिसांच्या टीम तैनात ठेवलेल्या आहेत.  पावसाचा जोर कमी असला तरी नागरिकांनी  महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Jul 14, 2024 15:48 (IST)

नाशिक ते मुंबई, 180 किमीच्या प्रवासाला जवळपास सात-आठ तास

मुंबई महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक ते मुंबई या 180 किलोमीटरच्या प्रवासाला जवळपास सात ते आठ तास लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. त्यामुळे सकाळपासून नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी कायम असल्याने प्रवाशांनी नाशिक मुंबई महामार्गावर प्रवास करताना नाराजी व्यक्त केली आहे. 

Jul 14, 2024 15:43 (IST)

विशाळगडावर तणावपूर्णस्थिती, जाळपोळीच्याही घटना

विशाळगडावर तणावपूर्णस्थिती, जाळपोळीच्याही घटना

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा पेटला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. 

Jul 14, 2024 15:41 (IST)

500 किमीचा प्रवास करत संत मुक्ताई आली पंढरपूरला...

संत मुक्ताई यांची पालखी पंढरपुरात दाखल...

500 किमीचा प्रवास करत संत मुक्ताई आली पंढरपूरला...

मानाच्या संताच्या पालख्यामध्ये असणारी संत मुक्ताई यांची पालखी आज पंढरपूर येथे दाखल झाली आहे. मुक्ताईनगर जळगाव येथून 35 दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूर येथे दाखल झाली आहे. आता आषाढीच्या वेध लागले असताना पहिल्यांदाच प्रमुख संतापैकी संत मुक्ताई पंढरपूर नगरीत दाखल झाली आहे. ही पालखी आता पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात वास्तव्यास असेल तर बंधू भेटीसाठी ही पालखी 16 जुलै रोजी वाखरी येथे जाईल.

Advertisement
Jul 14, 2024 15:04 (IST)

जनसन्मान रॅलीतून अजित पवार Live...

जनसन्मान रॅलीतून अजित पवार Live...

Jul 14, 2024 14:47 (IST)

कसं आहे पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ.. पाहा VIDEO

Advertisement
Jul 14, 2024 14:11 (IST)

राजापूरमधील अर्जुना व कोदवली नदीला पूर

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

राजापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती

 

राजापूरमधील अर्जुना व कोदवली नदीला पूर 

राजापूर नगर परिषदेकडून बाजारपेठेतील व्यापा-यांना धोक्याच्या सूचना

नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन

Jul 14, 2024 12:35 (IST)

पुण्यात वाहनाच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

पुण्यात वाहनाच्या तोडफोडीचे सत्र सुरूच. पुण्यातील पर्वती पोलीस स्थानकाच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञाताकडून जनता वसाहतीत वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. वारंवार होणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. 

Advertisement
Jul 14, 2024 12:24 (IST)

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजप महिला आघाडीचे कार्यकर्त्या विमानतळावर

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजप महिला आघाडीचे कार्यकर्त्या विमानतळावर फलक घेऊन दाखल. महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थिनींना मोफत शिक्षण योजना लागू केल्याबद्दल स्वागत करण्यात येणार आहे. 

Jul 14, 2024 11:15 (IST)

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. 

Jul 14, 2024 10:44 (IST)

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर आहे, मात्र ही जगबुडी नदीने ही धोका पातळी ओलांडली असून सध्या जगबुडी नदी 8 मीटरवर वाहत आहे. त्यामुळे खेडमध्ये काही लोकांच्या घरापर्यंत पाणी आलं आहे. त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालं आहे. दरम्यान याबाबत माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून नागरिकांना, व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी  वाढत आहे.तरी नागरीकांनी व व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच  सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेणेत यावी तसेच काही अडचण किंवा मदत हवी असल्यास संपर्क करावा असं आवाहन वैभव खेडेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

Jul 14, 2024 10:01 (IST)

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, कुठे किती पडला पाऊस?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 122.64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सतराशे मिलीमीटरची सरासरी गाठली आहे. तसेच जिल्ह्यात यावर्षी आजपर्यंत 50 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस हा गुहागर तालुक्यात पडला असून, गुहागरमध्ये तब्बल 146.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल संगमेश्वरमध्ये 139.50 मिलीमीटर, मंडणगडमध्ये 133.25 मिलिमीटर,  दापोलीमध्ये 128.43 मिलिमीटर, रत्नागिरीत 119.67 मिलिमीटर, लांजामध्ये 119.40 मिलिमीटर, तर चिपळूण आणि राजापूरमध्ये 109 मिलिमीटर, आणि गुहागरमध्ये 99.28 मिलिमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झालेली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत 1699.26 मिलिमीटरची सरासरी गाठली आहे. तर यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत 50.51 पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षीची पावसाची आकडेवारी चांगलीच समाधानकारक आहे.

Jul 14, 2024 09:37 (IST)

लोकसभेत पराभव, अजित पवार गटाचा विधानसभेच्या तयारीला सुरुवात...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेसाठी पुढे सरसावली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बारामतीतमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जवळपास सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून साधारणता 25 हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

Jul 14, 2024 09:06 (IST)

रायगडात पुराच्या पाण्यात अडकली एसली

Jul 14, 2024 09:05 (IST)

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. उत्तर रायगडमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. खोपोली शहरातील हायको कॉर्नर, युनीमाउंट रेसिडेन्सी भागात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे.

पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Jul 14, 2024 09:02 (IST)

प्रत्येक वारकऱ्याची होणार 12 प्रकारची आरोग्य तपासणी, पंढरपुरात चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर

प्रत्येक वारकऱ्याची होणार 12 प्रकारची आरोग्य तपासणी, पंढरपुरात चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत चार ठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिराची तयारी आता पूर्ण झाली आहे. येथे  येणाऱ्या प्रत्येक भाविकाची बारा प्रकारची तपासणी या शिबिरामध्ये होईल. तसेच भाविकांना सकस आहार देखील दिला जाणार आहे. कसं असेल पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराचे नियोजन. 

Jul 14, 2024 09:00 (IST)

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

पालघर जिल्ह्यात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी, आकाशात ढग दाटलेले आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती बदलू शकते. काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. पालघर डहाणूच्या काही भागातील नाले ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.