सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृष्णा नदीसह जत, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमधून शेतीसाठी होणारा पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठादेखील खंडित करण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे आधीच पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कृष्णाकाठच्या भागातील पिके करपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.