वाशिम जिल्ह्यात पावसाच्या दिरंगाईमुळे पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला असतानाही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १० पूर्णांक ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात अवघा ८ पूर्णांक ५२ टक्के पाणी उरले आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत गेल्या वर्षी या धरणात ३१ टक्के पाणीसाठा होता. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.