चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी पुराचे चटके शेतकऱ्यांना बसले आहेत. वर्धा, इरई आणि झरपट नद्यांच्या पुराचे पाणी अडीच दिवस शेतात साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे चित्र समोर आले असून यंदाचा खरीप हंगाम हातातून गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. नदीकाठच्या भागात पाणी एक ते दीड किलोमीटरपर्यंत पसरल्याने मोठ्या क्षेत्रातील शेती बाधित झाली असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.