मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापलं आहे. अमोल खुणे आणि अजय बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याविरोधातील आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. याशिवाय जरांगे मुंबईला गेले असते तर 84 ते 85 जणांना उचललं असतं, असा खळबळजनक दावाही काळकुटे यांनी केला आहे. पुढच्या आठवड्यात स्वतः ईडी कार्यालयात जाऊन चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.