वाढते तापमान आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसू लागला आहे. कडक उन्हामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने तसेच वाहतूक खर्च वाढल्याने बाजारातील दर तेजीत आहेत. फरसबीने थेट २०० रुपये किलोचा टप्पा गाठला असून, गवार, घेवडा, वाटाणा यांच्याही किमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान वाढत आहे. परिणामी, घाऊक बाजारातील वाढलेले दर किरकोळ बाजारात अधिकच चढ्या भावाने ग्राहकांना मोजावे लागत आहेत.